*प्रविण कुंटे उमरखेड प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड तालुक्यातील बाळदी ग्रामपंचायतीत संतापाचा ज्वालामुखी धगधगत असून प्रशासनाच्या निष्क्रियतेविरुद्ध ग्रामस्थांनी थेट रणशिंग फुंकले आहे. ग्रामसेवक श्री. डी. बी. सूर्यवंशी यांची तात्काळ बदली करावी, या ठाम मागणीसाठी ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे धडक निवेदन सादर केले आहे. “शासन निर्णय कागदावरच का?” असा थेट सवाल करत ग्रामस्थांनी प्रशासनालाच कठघऱ्यात उभे केले आहे.
दि. 28 मार्च 2025 रोजी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने जाहीर केलेल्या बदली धोरणानुसार ग्रामसेवकांसाठी ठरावीक कालमर्यादा व निकष स्पष्ट करण्यात आले आहेत. मात्र, संबंधित ग्रामसेवक चार वर्षे प्रभारी आणि एक वर्ष कायमस्वरूपी अशा तब्बल पाच वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. “धोरण धाब्यावर, मुदतवाढीचा खेळ वरवर?” असा रोखठोक प्रश्न उपस्थित होत आहे.
निवेदनात ग्रामपंचायतीच्या कारभारातील अनियमितता, शासकीय कामांतील विलंब, आर्थिक व्यवहारांबाबत निर्माण झालेल्या संशयाच्या छाया आणि पारदर्शकतेचा पूर्ण अभाव यांचा उल्लेख करत ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “गावाच्या विकासाचा वेग रोखणाऱ्या कारभारावर लगाम लावा,” अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, काही प्रकरणांबाबत व्हिडिओ पुरावे उपलब्ध असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला असून ते प्रशासनासमोर सादर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या प्रकरणाला आणखी तुफानी वळण मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
या निवेदनाच्या प्रती विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यवतमाळ, उपविभागीय अधिकारी उमरखेड तसेच संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्या आहेत. शासनाचा स्पष्ट आदेश असताना त्याची अंमलबजावणी का झाली नाही? एकाच अधिकाऱ्याला वारंवार संरक्षण का? स्थानिक तक्रारींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष तर झाले नाही ना? अशा धारदार प्रश्नांनी प्रशासनाला घेरले जात आहे.
दरम्यान, ग्रामसेवक बदलीच्या मागणीसाठी लवकरच उपोषणाची तारीख निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली आहे. जिल्हा परिषद मुख्याधिकारी, यवतमाळ यांच्या कार्यालयासमोर हे उपोषण छेडण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनावर आता थेट दबाव वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
ग्रामस्थांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, तातडीने निष्पक्ष चौकशी करून बदलीची कारवाई झाली नाही तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल. बाळदी ग्रामपंचायतीतील हा संतापाचा स्फोट आता प्रशासनाच्या दारातच पडला असून, “कारवाई की मौन?” हा निर्णायक क्षण ठरणार आहे.

Post a Comment
0 Comments