महागांव प्रतिनिधी दवंडी वार्तापत्र विवेक नरवाडे
तालुक्यातील लिलाव झालेल्या रेती घाटांवर नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या वाढत्या तक्रारींची गंभीर दखल घेत प्रशासनाने कडक पाऊल उचलले आहे. मा. उपविभागीय अधिकारी, उमरखेड यांनी दि. २३ मार्च २०२६ रोजी दूरध्वनीद्वारे दिलेल्या निर्देशानुसार पुढील आदेशापर्यंत संबंधित रेती घाटांवरील उत्खनन पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, महागाव तालुक्यातील मौजा भोसा, जनुना, करंजखेड व वरोडी येथील रेती घाटांवर मोठ्या प्रमाणात नियमभंग होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे सातत्याने येत होत्या. स्थानिक नागरिक तसेच प्रसारमाध्यमांमधूनही या प्रकारांना वाचा फोडण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने कारवाई करत संबंधित सर्व घाटांवर उत्खननास मनाई केली आहे.
प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला असून, बंदी आदेशाचे उल्लंघन करताना कोणी आढळल्यास त्यांच्यावर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे. महसूल व पोलीस यंत्रणांना देखरेखीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, या निर्णयामुळे बेकायदेशीर उत्खननाला आळा बसून पर्यावरण संरक्षणाला चालना मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Post a Comment
0 Comments