मारेगाव पोलिसांचा लोकशाहीवर वरवंटा; पत्रकारांशी अरेरावी करणाऱ्या खाकीचा बुरखा फाडणार!
मारेगाव : तालुक्यातील घडणाऱ्या गुन्हेगारी व इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पत्रकारांना वेळेवर उपलब्ध करून दिली जात नसल्याने पत्रकार संरक्षण समिती, मारेगाव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भात समितीच्या वतीने पोलीस निरीक्षकांना लेखी निवेदन सादर करून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
नेमकी तक्रार काय?
पत्रकार संरक्षण समितीने दिलेल्या निवेदनात खालील मुख्य मुद्दे मांडले आहेत:
माहिती देण्यास नकार: मारेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत अनेक महत्त्वाच्या घटना घडतात, ज्याची नोंद पोलीस दप्तरी असते. मात्र, पत्रकार माहिती विचारण्यासाठी गेले असता त्यांना माहिती देण्यास स्पष्ट नकार दिला जातो.
तक्रार नसल्याचे पालुपद: कोणतीही घटना घडल्यानंतर "या प्रकरणाची तक्रारच दाखल झालेली नाही" असे सांगून पोलिसांकडून पत्रकारांची बोळवण केली जाते. परिणामी, जनतेपर्यंत सत्य माहिती पोहोचवण्यास अडथळा निर्माण होत आहे.
कर्मचाऱ्यांची अरेरावी: माहिती विचारताना काही पोलीस कर्मचारी पत्रकारांशी अरेरावीची भाषा वापरतात, अशा तक्रारीही निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत.
लोकशाहीचा चौथा स्तंभ अडचणीत?
पत्रकार हे समाजात घडणाऱ्या घटना वृत्तपत्रांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम करत असतात. मात्र, पोलिसांच्या या असहकार्यामुळे पत्रकारांना आपले कर्तव्य बजावणे कठीण झाले आहे. जर शासकीय यंत्रणाच माहिती लपवून ठेवणार असेल, तर पारदर्शकता कशी राहणार? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
निवेदन देणारे पदाधिकारी
यावेळी पत्रकार संरक्षण समितीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. निवेदनावर भैयाजी कन्नाके, मोरेश्वर ठाकरे, सुरेश नाखले, सुमित हेपट, भास्कर राऊत, शरद खापणे, सुरेश पाचभाई ,सचिन मेश्राम यांच्यासह इतर पत्रकारांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
आता या निवेदनानंतर मारेगाव पोलीस प्रशासन आपली भूमिका सुधारणार का? आणि पत्रकारांना सन्मानाची वागणूक मिळणार का? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Post a Comment
0 Comments