Type Here to Get Search Results !

बाळदी–पिरंजी–मेट रस्ता रुंद करा अन्यथा प्रहारचे आंदोलन – प्रशासनाला थेट इशारा

 


प्रवीण कुंटे , उमरखेड प्रतिनिधी

उमरखेड तालुक्यातील बाळदी–पिरंजी–मेट या गावांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता अरुंद अवस्थेतच ठेवल्यामुळे नागरिकांचे जीव धोक्यात घालण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू असल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाने केला आहे. रस्त्याच्या साईडचे तातडीने रुंदीकरण न केल्यास आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट आणि थेट इशारा देण्यात आला आहे. या रस्त्यावरून दररोज शेतकरी, विद्यार्थी, नागरिक तसेच फुलसावंगी व ढाणकीकडे जाणारी अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते.

मात्र रस्ता अतिशय अरुंद असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांची बस पलटी होण्यापासून थोडक्यात बचावली होती. ही गंभीर घटना प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध होऊनही प्रशासनाने कोणतीही ठोस कार्यवाही केलेली नाही. जंगलालगतचा परिसर असल्याने रात्रीच्या वेळी वन्यप्राण्यांचा रस्त्यावर वावर असतो.

अरुंद रस्त्यामुळे समोरून येणाऱ्या जड वाहनांना वाट देताना दुचाकी व चारचाकी वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात आली असून, एखादी मोठी दुर्घटना घडण्याचीच वाट प्रशासन पाहत आहे का, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम उपविभाग, उमरखेड यांना कायदेशीर मार्गाने निवेदन देण्यात आले आहे. बाळदी–पिरंजी–मेट रस्त्याच्या साईडचे तातडीने रुंदीकरण सुरू न झाल्यास, प्रहार जनशक्ती पक्ष रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

निवेदन देतेवेळी प्रहार सर्कल प्रमुख प्रवीण इंगळे, प्रहार सेवक नितीन राठोड यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कारवाई नाही, तर आंदोलन अटळ

नागरिकांच्या जीवित सुरक्षेचा प्रश्न असताना प्रशासनाने अजूनही डोळेझाक केली आहे. तात्काळ रुंदीकरणाचे काम सुरू न झाल्यास प्रहार जनशक्ती पक्ष रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल. कोणतीही अनुचित घटना घडल्यास जबाबदारी संबंधित यंत्रणेची राहील. — प्रवीण इंगळप्रहार जनशक्ती पक्ष

बाळदी–कृष्णापूर सर्कल प्रमुख 

Post a Comment

0 Comments