Type Here to Get Search Results !

निफाडच्या पूर्व भागात अवकाळी पावसाचा तडाखा



  जोरदार वारे, विजांचा कडकडाट; कांदा, द्राक्षबागा व चाऱ्याचे मोठे नुकसान


प्रतिनिधी :   गणेश ठाकरे लासलगाव 

    निफाड तालुक्याच्या पूर्व भागातील शिरवाडे, वाकद, देवगाव, कानळद, मानोरी आदी गावांमध्ये आज दिनांक १३ मे सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास अचानक अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. प्रचंड वेगाने वाहणारे वारे, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून ऐन उन्हाळ्यात आलेल्या या पावसामुळे ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

        सायंकाळपर्यंत वातावरण उकाड्याचे असतानाच अचानक काळे ढग दाटून आले. त्यानंतर काही मिनिटांतच वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. अनेक ठिकाणी वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की शेतात कांद्याच्या झाकलेल्या पोळ्यांवरील कागद व ताडपत्र्या उडून गेल्या. त्यामुळे उन्हात वाळत ठेवलेला कांदा थेट पावसात भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.

      याशिवाय जनावरांसाठी साठवून ठेवलेला चारा देखील पूर्णपणे भिजला असून अनेक शेतकऱ्यांना आता जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काही ठिकाणी द्राक्षबागांमध्ये जोरदार वाऱ्यामुळे काड्या मोडल्या गेल्याने बागांचे नुकसान झाले. आधीच हवामानातील बदल, वाढलेला उत्पादन खर्च आणि बाजारभावातील अनिश्चितता यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसाने आणखी मोठा फटका बसला आहे. कांदा चाळींमध्ये साठवून ठेवलेला कांदाही प्रचंड वाऱ्याने पावसाचे पाणी शिरल्याने भिजला. अचानक आलेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांना धावपळ करत कांदा, चारा आणि शेतीमाल वाचवण्यासाठी प्रयत्न करावे लागले. काही ठिकाणी वीज पुरवठाही खंडित झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

     दरम्यान, नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. अवकाळी पावसाच्या या तडाख्यामुळे निफाडच्या पूर्व भागातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.



Post a Comment

0 Comments