Type Here to Get Search Results !

महागांव पोलिसांची तत्परता: भीषण अपघातातून पाच जणांचे प्राण वाचवले



 पोलीस इन्स्पेक्टर सुनील अंबुरे ठरले 'खाकीतील देवदूत'

दवंडी वार्तापत्र महागांव प्रतिनिधी  विवेक नरवाडे 

रात्रीच्या वेळी महागांव बायपासवर झालेल्या एका भीषण अपघातात पाच जणांचा जीव वाचवण्यात महागांव पोलीस स्टेशनचे पोलीस इन्स्पेक्टर (PI) सुनील अंबुरे आणि त्यांच्या पथकाला मोठे यश आले आहे. ऐनवेळी शासकीय वाहनाचा वापर करून जखमींना वेळेत रुग्णालयात दाखल केल्यामुळे या पाचही जणांचे प्राण वाचले आहेत.


नेमकी घटना:

बुधवारी, २४ जून २०२६ रोजी पहाटे ३:०० च्या सुमारास महागांव पोलिसांचे पथक गस्तीवर असताना भिसे पेट्रोल पंपाजवळ एक भीषण अपघात झाल्याचे निदर्शनास आले. MH 13 ES 7750 क्रमांकाची अर्टिगा कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली. या भीषण धडकेत गाडीतील प्रवासी बाहेर फेकले गेले.

अपघातातील जखमींमध्ये सुदर्शन ढाकू राठोड, सावन शिवराज पवार, अजित शिवा पवार, आदित्य गोविंद जाधव आणि ६ महिन्यांची गर्भवती असलेल्यासौ. सुप्रिया सावन पवार यांचा समावेश आहे. हे सर्वजण प्रतापनगर तांडा, सोलापूर येथील रहिवासी आहेत.

पोलीस धावले मदतीला:

अपघातस्थळी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचे पाहून प्रभारी ठाणेदार महागांव तथा API सुनील अंबुरे यांनी प्रसंगावधान राखले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता स्वतःच्या शासकीय वाहनाने व स्थानिक नागरिकांच्या मदतीने सर्व जखमींना पुसद येथील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये तातडीने हलवले. डॉक्टरांनी तत्काळ उपचार सुरू केल्याने आता सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.


 विशेषतः गर्भवती महिलेवर  डॉक्टरांकडून विशेष उपचार केले जात आहेत.


'खाकीतील देवदूत' म्हणून ओळख:

सुनील अंबुरे यांची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी वणी येथील एका अपघातग्रस्त कुटुंबाला आणि एका आजारी महिलेला जीवदान दिले आहे. प्रतिकूल परिस्थितीत आणि मध्यरात्रीही कर्तव्य बजावून माणुसकीचे दर्शन घडवणाऱ्या अंबुरे यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.


"अपघातग्रस्तांना मदत करणे हे सर्वोच्च कर्तव्य"

या कार्याबाबत बोलताना, "कुणाचा जीव वाचवणे यापेक्षा दुसरे कोणतेही महान कार्य नाही," अशी भावना

व्यक्त केली जात आहे. वेळेवर मिळालेल्या मदतीमुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात, हा संदेश देण्यासाठी या घटनेची दखल घेतली जात असून, पोलीस दलातील अशा संवेदनशील अधिकाऱ्यांमुळे पोलिसांविषयीचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.


Post a Comment

0 Comments