Type Here to Get Search Results !

महागांवात गॅस वितरणाचा भोंगळ कारभार उघड



; शेतात उघड्यावर सिलिंडर वाटप, संतापाचा स्फोट! बाळू पाटील नरवाडे आक्रमक; ही सेवा नव्हे, नागरिकांची पिळवणूक… तात्काळ व्यवस्था सुधारा, अन्यथा आंदोलन अटळ!


प्रतिनिधी महागांव विवेक नरवाडे दवंडी वार्तापत्र 

महागांव : शहरात घरगुती गॅस सिलिंडर वितरणाचा प्रश्न आता गंभीर वळणावर पोहोचला असून, गॅस एजन्सीच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांचा संयम सुटू लागला आहे. घरपोच सेवा देण्याऐवजी ग्राहकांना गोदामावर बोलावणे आणि तेथूनही योग्य वितरण न करता थेट एका शेतातील मोकळ्या जागेत उघड्यावर सिलिंडर वाटप करणे, हा प्रकार नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. या संपूर्ण घटनेने शहरात संतापाची लाट उसळली असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

गॅस एजन्सीकडून कोणतेही ठोस नियोजन न करता नागरिकांना स्वतः येऊन सिलिंडर घ्या असा फर्मान काढण्यात आला. नागरिक मोठ्या अपेक्षेने गोदामावर पोहोचले; मात्र तेथेही वितरणाची कोणतीही सुसूत्र व्यवस्था नव्हती. उलट, जवळच्याच एका शेतात उघड्यावर सिलिंडर वाटप सुरू असल्याचे सांगण्यात आले. परिणामी नागरिकांना पुन्हा त्या ठिकाणी धाव घ्यावी लागली.

या शेतात ना कोणतेही शेड, ना पिण्याच्या पाण्याची सुविधा, ना बसण्याची व्यवस्था — अशा पूर्णतः अव्यवस्थित परिस्थितीत नागरिकांना उन्हाच्या कडक झळांमध्ये तासन्‌तास उभे राहावे लागले. विशेषतः वयोवृद्ध महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि लहान मुलांसह आलेल्या कुटुंबांची अवस्था अत्यंत बिकट झाली. अनेकांनी थकून-भागूनही सिलिंडर मिळवण्यासाठी धडपड केली जात आहे 

गॅस घ्यायला आलो की शिक्षा भोगायला? असा सवाल एका वृद्ध महिलेने संतप्त स्वरात व्यक्त केला. काही महिलांनी तर अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. घरकाम सोडून, उन्हात उभं राहून, तासन्‌तास थांबावं लागतंय… ही कसली सेवा? असा रोष सर्वत्र दिसून आला.

या गोंधळात आणखी एक गंभीर बाब समोर आली. काही ग्राहकांकडून सिलिंडर वाहतुकीसाठी अतिरिक्त पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी पुढे आल्या. त्यामुळे हा प्रकार केवळ गैरसोय नसून सरळसरळ आर्थिक लूट असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. घरपोच सेवा बंद करून आम्हाला स्वतः पैसे खर्च करून सिलिंडर न्यायला लावलं जातंय… ही अन्यायकारक बाब आहे, अशी भावना व्यक्त होत आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकारात महसूल प्रशासन आणि पुरवठा विभागाची भूमिका अत्यंत निष्क्रिय दिसून आली. इतक्या मोठ्या प्रमाणावर उघड्यावर आणि नियमबाह्य पद्धतीने सिलिंडर वाटप होत असतानाही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही. त्यामुळे प्रशासन झोपेत आहे का? असा सवाल नागरिकांकडून थेट विचारला जात आहे.

या पार्श्वभूमीवर युवा शेतकरी नेते बाळू पाटील नरवाडे यांनी या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी थेट गॅस एजन्सी आणि प्रशासनावर हल्लाबोल करत नागरिकांच्या भावना मांडल्या.

ते म्हणाले,घरगुती गॅस ही जीवनावश्यक सेवा आहे. नागरिकांना सन्मानाने आणि सुरक्षिततेने सेवा मिळणे हा त्यांचा हक्क आहे. मात्र महागांवात नागरिकांना शेतात उभं करून सिलिंडर वाटलं जातंय, ही अत्यंत लाजिरवाणी आणि अमानुष बाब आहे.

नरवाडे यांनी पुढे स्पष्ट इशारा दिला —

तात्काळ घरपोच सेवा सुरू करून ही भोंगळ व्यवस्था बंद केली नाही, तर आम्ही नागरिकांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरू. आंदोलन उभारल्याशिवाय पर्याय राहणार नाही.

त्यांनी प्रशासनालाही जाब विचारला. इतका मोठा गोंधळ सुरू असताना अधिकारी काय करत होते? नागरिकांना होणारा त्रास दिसत नाही का? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

या घटनेनंतर महागांव शहरात तीव्र असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक नागरिकांनी बाळू पाटील नरवाडे यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला असून, आता सहनशक्ती संपली असे स्पष्टपणे सांगितले आहे.

नागरिकांची मागणीही ठाम आहे —

संबंधित गॅस एजन्सीवर तातडीने कठोर कारवाई करावी

घरपोच गॅस वितरण सेवा त्वरित सुरू करावी

उघड्यावर सिलिंडर वाटप करणाऱ्यांवर नियमांनुसार कारवाई करावी

नागरिकांना होणाऱ्या आर्थिक व मानसिक त्रासाची दखल घ्यावी

महागांवात सध्या परिस्थिती तणावपूर्ण असून, प्रशासनाने तातडीने पावले उचलली नाहीत, तर हा प्रश्न मोठ्या आंदोलनाचे रूप घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.


शेवटी एकच प्रश्न सर्वांच्या मनात घुमतो आहे —

सुविधा आहेत… पण सेवा कुठे आहे?


आणि त्यासोबतच नागरिकांचा निर्धारही स्पष्ट ऐकू येतो —

आता अन्याय सहन नाही… हक्कासाठी लढा ठरलेलाच!


Post a Comment

0 Comments